रत्नागिरी : येथील निवृत्त शिक्षिका श्रीमती कमल पुरुषोत्तम बावडेकर यांच्या ‘कमलकुंज’ या पुस्तकाचे प्रकाशन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ३० सप्टेंबर २०१८ रोजी रत्नागिरीत होणार आहे. अवेश्री प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
रविवारी सकाळी १० वाजता मारुती मंदिर परिसरातील जोगळेकर कॉलनी येथील दामले विद्यालयानजीकच्या लक्ष्मी-विष्णू सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दूरदर्शन केंद्राचे सहायक संचालक जयू भाटकर उपस्थित राहणार आहेत.
या पुस्तकामध्ये चाकोरीबाहेरच्या कथा, शब्दचित्र, प्रासंगिक लेखन, आत्मकथन लेखसंग्रह, गौरवपर लेख समाविष्ट आहेत. ८३ वर्षांच्या कमलताई बावडेकर म्हणजे उत्साहाचा मूर्तिमंत झरा. पेशाने त्या शिक्षिका होत्या. आयुष्यभर शिकवताना अनेक विषयांवर मनातल्या मनात चिंतन घडत गेले आणि सवड मिळताच त्या लिहीत गेल्या. त्यातूनच कमलकुंज हे पुस्तक लिहून पूर्ण झाले. कोकणातील जुन्या वळणाच्या वातावरणात आयुष्य कंठलेल्या एका मध्यमवर्गीय स्त्रीच्या प्रतिभेचा वाचकांना अनुभव देणारे हे पुस्तक आहे.
जास्तीत जास्त रसिक, वाचकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मनीषा रेगे व राजश्री कामत यांनी केले आहे.